मुंबई : राज्यातील हवामान सध्या अत्यंत अस्थिर झाले असून, एकाच वेळी तीव्र उष्णतेची लाट आणि वादळी पावसाचा इशारा अशा दुहेरी संकटाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. भारतीय हवामान विभाग यांनी पुढील काही दिवसांसाठी सतर्कतेचा इशारा दिला असून, नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामानातील या अचानक बदलांमुळे राज्यातील अनेक भागांमध्ये दैनंदिन जीवनावर परिणाम होताना दिसत आहे.
हवामान तज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. नागपूर येथे ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, अकोला येथे तब्बल ४४ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचले आहे. एप्रिलच्या सुरुवातीला पडलेल्या अवकाळी पावसामुळे निर्माण झालेला गारवा आता पूर्णपणे नाहीसा झाला असून, तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी, उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही परिस्थिती चिंताजनक आहे. पुणे शहरात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, नागरिकांना विशेषतः दुपारच्या वेळी बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यात ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, येथे पुढील आठवडाभर उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उष्माघाताच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने विशेष कक्षाची स्थापना केली आहे.
दरम्यान, राज्यावर दुहेरी संकट ओढावल्याचे चित्र दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर येथे १५ आणि १६ एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट, तर १७ एप्रिल रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, अचानक वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातही तापमान ४२ अंशांपर्यंत पोहोचले असून, उष्णतेची तीव्रता कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.
कडक उन्हामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये दुपारच्या वेळेत रस्त्यांवरील वर्दळ कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. नागरिक उष्णतेपासून बचावासाठी सावलीचा आधार घेत असून, आवश्यक तेवढ्याच कामासाठी घराबाहेर पडत आहेत. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. पुरेसे पाणी पिणे, हलका आणि सैल कपडे वापरणे, शक्यतो दुपारच्या उन्हात बाहेर न पडणे, तसेच वादळी वाऱ्याच्या वेळी सुरक्षित ठिकाणी राहणे अत्यावश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
एकूणच, पुढील काही दिवस राज्यासाठी हवामानाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील ठरणार असून, उष्णतेची लाट आणि वादळी पावसाचा दुहेरी परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर आणि दैनंदिन जीवनावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनासोबतच नागरिकांनीही सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

तापमानातील वाढीवर लेख आपण चांगला लिहिला आहे. परंतु आता इथून पुढे दरवर्षी आपणास उन्हाळ्यात कायमच असे म्हणावे लागणार आहे.याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे घटते जंगल. भारत भूमीवरची हिरवी शाल कमी कमी होत चालली आहे. आणि ही हिरवाई कमी करण्यामध्ये राज्यकर्ते आणि प्रशासनाचा वाटा सिंहाचा आहे. वेगवेगळ्या विकास योजनांच्या नावाखाली पर्यावरण विघातक प्रकल्प येथे आणले जात होते आणि अजूनही आणले जात आहेत. विशेषतः कोकण आणि सह्याद्री मधील जंगल याला बळी पडले आहे. पश्चिम घाटातील वनराईला जागतिक वारसा दर्जा मिळाल्या मुळे तेथे जैवविविधता अजूनही टिकून आहे. नाही तर आमचे राज्यकर्ते, मोठमोठी नेते मंडळी आणि पुणे, मुंबई किंवा इतर मेगा सिटीतील लोकांनी हे डोंगर खरेदी करून तेथे फार्म हाऊस किंवा खाणी खणून सह्याद्रीची पार वाट लावली असती. देशाच्या विकासात रस्ते महत्त्वाची भूमिका वठवतात त्यामुळे देशभर सरकारने रस्त्यांचे जाळे निर्माण केले ही चांगली गोष्ट आहे परंतु आहे त्या रस्त्यांच्या मेंटेनन्स कडे लक्ष न देता अनावश्यक तेथे महामार्ग बनवण्याचा अट्टाहास केला जातो आणि याचा पर्यावरणावर खूप वाईट परिणाम होतो आहे. कोकणातील महामार्ग व विविध घाट रस्त्याच्या कामामुळे हजारो, लाखो दुर्मिळ वृक्ष तोडले गेले आहेत. तेथील ओढे, ओघळी, नाले इ. काही बुजवले गेले आहेत, काहींचे मार्ग बदलले आहेत. या. आणि हे तोडले गेलेले किंवा कत्तल झालेले जे वृक्ष आहेत त्यांचे पुढे काय झाले? हा मोठा गहन प्रश्न आणि संशोधनाचा विषय आहे. पर्यावरणावर फार मोठा आघात आपण केला आहे. प्रचंड लोकसंख्या, वाहनांची प्रचंड संख्या आणि वाहनांचा बेसुमार, अनियंत्रित वापर, कसलीही प्रक्रिया न करता कारखान्यातून सोडले जाणारे विषारी वायू, पाणी, आणि घटते जंगल या आणि अशा अनेक कारणांमुळे पृथ्वीचे तापमान वाढते आहे. पर्यावरण तज्ञ गेली अनेक वर्षे इशारा देत आहेत पण स्वार्थी राज्यकर्ते आणि पर्यावरण विषयी बेफिकीर जनता यांच्या मुळे ही परिस्थिती ओढवली आहे. एक साधी गोष्ट आहे. आजकाल कुठल्याही क्षुल्लक कारणासाठी अगदी गावरान भाषेत सांगायचे झाले तर हगल्यापादल्यासाठी पण फटाक्यांची आतषबाजी केली जाते. माकडाच्या हाती कोलीत अशी स्थिती आहे. पण या आतषबाजी मुळे वातावरणात विषारी वायू मोठ्या प्रमाणात सोडले जातात, प्रदूषण वाढते, तापमान वाढते, ध्वनी प्रदूषण आणि प्रचंड कचरा निर्माण होतो हे आमच्या गावीही नसते. थोडा तरी विचार करावा की विचार करण्याची क्षमताच संपलीय काही कळत नाही. मग नुसतेच तापमान वाढलेय म्हणून ओरडण्यात काय अर्थ आहे.