पुणे: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या विरोधातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट (ईडी)चा तपास बंद झाला आहे. दिल्लीतील एका विशेष न्यायालयाने या प्रकरणातील ईडीचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारल्याने कलमाडी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यानंतर पुण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करत पेढे वाटले.
१५ वर्षांपूर्वीच्या राष्ट्रकुल घोटाळ्याचा आरोप
२०१० मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांवरून हे प्रकरण सुरू झाले होते. तत्कालीन आयोजन समितीचे प्रमुख सुरेश कलमाडी, सरचिटणीस ललित भानोत यांसह इतर अधिकाऱ्यांवर अनियमितता केल्याचे आरोप होते. सीबीआयने याबाबत भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करून ३० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले होते. त्याच आधारावर ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा तपास सुरू केला होता.
पुराव्याचा अभाव, ईडीने तपास बंद
मात्र, गेल्या १५ वर्षांत या प्रकरणात कोणताही ठोस पुरावा सापडला नसल्याचे सीबीआयने नमूद केले. त्यानंतर ईडीनेही आपला तपास थांबवून क्लोजर रिपोर्ट सादर केली, जी न्यायालयाने मंजूर केली. यामुळे कलमाडींच्या विरोधातील आरोपांवर मात झाली आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांचा आनंद, भाजपवर टीका
या निर्णयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी कलमाडी यांच्या निवासस्थानाजवळ आनंदोत्सव साजरा केला. त्यांनी आरोप केला की, “भाजप, अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनी खोट्या आरोपांतून कलमाडींची प्रतिमा खाली आणण्याचा प्रयत्न केला. यामुळे पुणेकर एका चांगल्या नेतृत्वाला मुकले.”
कलमाडींच्या बाजूने न्यायालयीन निर्णय आल्याने राजकीय स्तरावर या प्रकरणाचा पुनर्चर्चा होत आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने याला ‘राजकीय सत्तेचा गैरवापर’ म्हटले आहे, तर भाजपने अद्याप याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही.
15 वर्षानंतर कलमाडी मनी लाँडरिंग प्रकरणात निर्दोष. ईडीने तपास थांबवला. हे निकाल अपेक्षित असेच असतात. जेथे न्यायाला विलंब तिथे न्यायाला नकार हे सूत्रच आहे. त्या नुसारच हे घडले आहे. गंमत म्हणजे कार्यकर्ते पण पेढे वाटायला लगेच गोळा होतात. आता सध्या जी प्रकरणे गाजत आहेत ती प्रकरणे सुद्धा अशीच दहा पंधरा किंवा वीस वर्षे रेंगाळत राहतील आणि क्लोज होतील. यात काही शंका नाही.