छत्रपती संभाजीनगर: औरंगजेबाच्या कबरीभोवती सुरू असलेल्या वादानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) सतर्क झाली असून, त्यांचे एक पथक आज छत्रपती संभाजीनगरात दाखल झाले आहे. या पथकाने खुलताबाद परिसराची पाहणी सुरू केली असून, जालना आणि परभणी या जिल्ह्यांतील संशयास्पद हालचालींवरही बारीक नजर ठेवली जात आहे.
मागील काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागपूरमध्ये या मुद्द्यावरून हिंसाचार उसळल्यानंतर प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांनी खबरदारी म्हणून पावले उचलायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर NIA च्या दिल्लीतील पथकाने मराठवाड्यात प्रवेश केला असून, संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीभोवती सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. यापूर्वी काही लोकप्रतिनिधींनी कबर मोडण्याच्या धमक्या दिल्याने वातावरण आणखी तापले होते. त्यामुळे राज्य राखीव पोलीस दलाचे जवानही या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. NIA चे पथक आता या प्रकरणातील संशयितांचा शोध घेत असून, मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्येही तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.
या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. छत्रपती संभाजीनगरातील ऐतिहासिक वारसा असलेल्या ठिकाणांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही या वादामुळे कमी झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, खुलताबाद परिसरात सध्या शांतता असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
NIA च्या या कारवाईमुळे मराठवाड्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे दिसत आहे. तपास यंत्रणा आता या वादामागील कारणांचा सखोल अभ्यास करत असून, पुढील काही दिवसांत याबाबत महत्त्वपूर्ण खुलासे होण्याची शक्यता आहे.
