मुंबई: केंद्र सरकारने लोकसभेत सादर केलेल्या वक्फ सुधारणा विधेयक २०२५ ला मुंबईतील मुस्लिम समाजाने उत्साहात स्वागत केले आहे. बोरीवली परिसरात भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या या निर्णयाचे कौतुक करत जल्लोष साजरा केला.
लोकसभेत विधेयकाची चर्चा
संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत विधेयक मांडले असून, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यावर ८ तासांची चर्चा नियोजित केली आहे. यापैकी एनडीएला ४ तास ४० मिनिटे तर विरोधी पक्षांना ३ तास २० मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे.
कोणता पक्ष कोठे?
तेलुगु देशम पार्टी (टीडीपी) आणि जनता दल युनायटेड (जेडीयू) यांनी विधेयकाला पाठिंबा दर्शविला आहे. तर, एआयएडीएमके, बीजू जनता दल आणि भारत राष्ट्र समिती यांनी विरोध केला असून चर्चेचा कालावधी १२ तास करण्याची मागणी केली आहे.
मुस्लिम समाजाची प्रतिक्रिया
मुंबई भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष वसीम आर. खान म्हणाले, “हा गरीब मुस्लिमांसाठी ऐतिहासिक निर्णय आहे. पंतप्रधान मोदी यांचे आम्ही आभारी आहोत.” उत्तर प्रदेशात पोलिस सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून, भोपालमध्ये मुस्लिम महिलांनी मोदींचे आभार मानले आहेत.
या विधेयकामुळे वक्फ संपत्तीच्या व्यवस्थापनात पारदर्शकता येण्याची अपेक्षा आहे, तर विरोधक याला राजकीय हल्ला मानत आहेत.
