पुणे : वेश्याव्यवसायाशी संबंधित भागांकडे समाजात अनेकदा पूर्वग्रहांच्या नजरेतून पाहिले जाते. पुण्यातील बुधवार पेठ हे त्याचे प्रमुख उदाहरण मानले जाते. मात्र या परिसराकडे केवळ वेश्याव्यवसायाचे केंद्र म्हणून पाहणे योग्य नसून, त्यामागे अनेक सामाजिक, ऐतिहासिक आणि मानवी पैलू दडलेले आहेत, असे मत सामाजिक कार्यकर्त्या तेजस्वी सेवेकरी यांनी व्यक्त केले आहे.
वेश्यावस्तीतील महिलांच्या हक्कांसाठी आणि पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या तेजस्वी सेवेकरी यांनी एका मुलाखतीत बुधवार पेठेचा इतिहास आणि तेथील वास्तव मांडले. त्यांच्या मते, बुधवार पेठेची मुळे पेशवेकाळापर्यंत पोहोचतात. त्या काळात या परिसराचा उल्लेख ‘बावनखणी’ म्हणून केला जात असे. येथे असलेल्या महिला केवळ शारीरिक संबंधांसाठी नव्हत्या, तर नृत्य, गायन आणि कलाविष्कारांच्या माध्यमातून पेशवे व सरदारांचे मनोरंजन करीत असत. त्यांना मानधन आणि सामाजिक संरक्षणही मिळत असल्याच्या नोंदी आढळतात.
ब्रिटिश राजवटीत परिस्थितीत मोठा बदल झाला. पुण्यात ब्रिटिश छावणी उभारल्यानंतर या भागाचा विस्तार करण्यात आला. त्यानंतर देशातील विविध भागांतून, विशेषतः आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील देवदासी परंपरेतील अनेक महिला येथे येऊन स्थायिक झाल्या. यामुळे बुधवार पेठेचे स्वरूप हळूहळू बदलत गेले.
बुधवार पेठेबाबत समाजात असलेल्या अनेक समजुतींनाही सेवेकरी यांनी आव्हान दिले. त्यांच्या म्हणण्यानुसार, या भागात येणारा प्रत्येक पुरुष केवळ शरीरसुखासाठीच येतो किंवा तो वाईट असतो, असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. मजूर, कामगार, मध्यमवर्गीय तसेच पांढरपेशा वर्गातील अनेक व्यक्ती येथे येतात आणि त्यांच्या येण्यामागील कारणेही वेगवेगळी असतात.
त्या सांगतात की, बुधवार पेठेत केवळ व्यवहारिक संबंधच नसतात, तर अनेकदा भावनिक नातेसंबंध आणि मैत्रीही निर्माण होते. काही पुरुष आणि महिलांमध्ये दशकानुदशके टिकलेली मैत्री असल्याच्या घटना येथे पाहायला मिळतात. अशा नात्यांमध्ये परस्पर सन्मान, आधार आणि जीवनातील अडचणींवर मार्ग काढण्याचा प्रयत्नही दिसून येतो.
याशिवाय अनेक पुरुषांनी वेश्याव्यवसायात असलेल्या महिलांशी विवाह करून त्यांना समाजात सन्मानाने जगण्याची संधी दिल्याची उदाहरणेही आहेत. काहींना यासाठी कुटुंबाचा विरोध, मालमत्तेवरील हक्क गमावण्यासारख्या अडचणींना सामोरे जावे लागले, तरी त्यांनी आपल्या जोडीदाराची साथ सोडली नाही.
बुधवार पेठेकडे पाहताना केवळ वेश्याव्यवसायाच्या चौकटीत न पाहता तेथील महिलांचे जीवन, संघर्ष, नातेसंबंध आणि सामाजिक वास्तव समजून घेण्याची गरज असल्याचे मत यानिमित्ताने पुढे आले आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या या घटकाकडे अधिक संवेदनशीलतेने पाहण्याची आवश्यकता असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
