पंढरपूर: पंढरपूरचा विठूराया तसा नवसाचा देव कधीच नाही मात्र तरीही देशभरातील भाविक देवाला आपल्या इच्छा साकडे घालतात आणि देव त्यांच्या इच्छांची पूर्तता देखील करतो. अशावेळी हे भाविक देवाला बोललेले नवस मंदिरात येऊन पूर्ण करतात. विठुराया हा गोरगरीब भाविकांचा देव असल्याने कधी देवाला पाळणे, कानातले, नाकातले असे लहान लहान सोन्या-चांदीचे दागिने देवाच्या दानपेटीत अर्पण करत असतात. ज्या भाविकांना सोन्या चांदीचे दागिने अर्पण करणे आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार शक्य होत नाही ते नवस फेडायला खोटे दागिने देवाला अर्पण करतात. काही भाविक खरे दागिने अर्पण करतात तर काही भाविकांना खरे दागिने म्हणून खोटे दागिने विकून सराफ त्यांची फसवणूक देखील करत असतात.
अर्पण केलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या विटा बनवणार
सध्या देवस्थानाकडे 31 किलो सोने आणि 1050 किलो चांदी जमा झालेली असून काही महिन्यांपूर्वी निर्णय झाल्याप्रमाणे लवकरच या अर्पण केलेल्या दागिन्यांच्या सोन्याच्या विटा बनवल्या जाणार आहेत. साधारण दरवर्षी देवाच्या खजिन्यात 3 किलो सोने आणि 200 किलो चांदीची वाढ होत असते. मात्र देवाला श्रद्धेने सोन्या चांदीचे दागिने अर्पण करणाऱ्या भाविकांनी स्वतःची फसवणूक टाळण्यासाठी सराफाकडून दागिन्यांची पावती घेण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.
