परभणीः परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील एका प्राथमिक शिक्षकाने आत्महत्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत गंभीर आरोप केले आहेत. सोपान उत्तमराव पालवे या शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या चिठ्ठीत शिक्षण संस्थेतील भ्रष्टाचार आणि फसवणुकीचा उल्लेख आहे.

 

चिठ्ठीनुसार, पालवे गेल्या चार वर्षांपासून नृसिंह प्राथमिक शाळा, मंगरुळ (बु) येथे शिक्षक होते. त्यांनी आरोप केला आहे की, नृसिंह शिक्षण प्रतिष्ठान, परभणीचे सचिव बळवंत मधुकर खळिकर यांनी त्यांच्याकडून २० लाख रुपये नगद घेतले. या पैशासाठी पालवे यांनी स्वतःचे शेत विकले आणि नातेवाईकांकडून कर्ज घेतले. संस्थेने बनावट कागदपत्रे सादर करून २०१८-१९ च्या संचमान्यतेनुसार २०१६ पासूनची संचमान्यता ऑनलाइन अपडेट न करता २० टक्के शालार्थावर पगार चालू केला. मार्च २०२४ मध्ये दोन शाळांचे बिल २० टक्क्यावरून ६० टक्क्यांवर काढण्यासाठी संस्थेने पालवे यांच्याकडून अतिरिक्त ५ लाख रुपये घेतले.

 

एप्रिल ते जून २०२४चे बिल अजून काढले नसून, जुलैचे बिल ६० टक्क्यांवरून २० टक्क्यांवर काढले गेले आहे. या फसवणुकीमुळे आणि दबावामुळे आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचे पालवे यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

 

या घटनेमुळे जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पालवे यांच्या आत्महत्येच्या घटनेची पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, संबंधित व्यक्तींविरुद्ध कारवाईची मागणी केली जात आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!